Skip to main content

देवदत्त निकम यांच्या धसक्याने भीमाशंकर कारखान्याचे घुमजाव?

समर्थ भारत वृत्तसेवा


मंचर ता. १६ : सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या दत्तात्रय नगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी कपात केली जात होती. या वाढीव कपातीस अनेक शेतकऱ्यांनी विरोध करूनही सदर कपात सुरूच होती. मात्र मा. चेअरमन आणि विद्यमान संचालक देवदत्त निकम यांनी कारखाना प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देताच; कारखाना प्रशासन धास्तावले असून कारखान्याच्या वतीने सदर कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याच्या पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टीच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आली असून; ही पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलामधून कपात करून संबंधित विभागाकडे वर्ग केली जात होती! ही अन्यायकारक दरवाढ रद्द होत नाही तोपर्यंत कारखान्याने उसाच्या बिलातून कपात करू नये अशी मागणी करत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला होता. मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीचा विचार न करता, कारखाना प्रशासनाने वसुली सुरूच ठेवली होती. मात्र भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक देवदत्त निकम यांनी पत्राद्वारे आंदोलनाचा इशारा देताच कारखाना प्रशासनाने सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सदर कपात न करण्याचा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले आहे.

पाणीपट्टीत भरमसाठ वाढ

उसाची पाणीपट्टी प्रती एकर ४५०/- रुपये होती, ती आता दहा पटीने वाढवून ४,५००/- रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी गहू, बाजरी, चारा पिकांची पाणीपट्टी एकरी ९०/- रुपयांच्या जवळपास होती, ती पाणीपट्टी जवळपास १७ पटींनी वाढून आता १,६५०/- रुपये करण्यात आली आहे.

काम निकमांचे आणि श्रेय सहकारमंत्र्यांना!

वाढीव पाणीपट्टी कारखान्याच्या बिळातून कापण्याच्या भूमिकेला देवदत्त निकम यांनी विरोध दर्शविल्यानंतर कारखान्याने घुमजाव करत पाणीपट्टी कपात न करण्याचा निर्णय घेतला, मात्र कारखान्याच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयात पत्रकात सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या सूचनेप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी कापण्यात आली असून, या कपातीलाही सहकार मंत्र्यांचे मार्गदर्शन किंवा सूचना होत्या का? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.

जोपर्यंत शासन वाढीव पाणीपट्टी दर रद्द करत नाही तोपर्यंत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टी कपात करू नये. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ज्या शेतकऱ्यांची २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत पाणी पाणीपट्टी कपात केली आहे; ती त्यांना त्वरित परत करावी अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल. (देवदत्त निकम, मा. चेअरमन, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना)


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.