Skip to main content

दोन चोरांनी केली तब्बल 25 गाड्यांची चोरी

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी: 



पुणे शहरासह पिंपरी चिंचवड परिसरात सध्या गु्न्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यात भूरट्या चोऱ्यांसह मोठ्या चोऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात चोरट्यांनी धूमाकूळ घातला असल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरी भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली असतानाच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनने चांगली कामगिरी करत शहरात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना, अट्टल चोरट्यांना वेगवेगळ्या ठिकाणी अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनने कारवाई करत दोघा अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ज्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर या कारवाईत तब्बल 21 गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुचाकी चोरीच्या प्रकरणात प्रदीप गायकवाड आणि आकाश घोडके अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडे आणखी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

प्रदीप गायकवाड या चोरट्याकडून पोलिसांनी तब्बल 21 दुचाकी जप्त केल्या आहेत तर आकाशकडून पोलिसांनी चार दुचाकी जप्त केल्या आहेत. एवढ्या दुचाकी चोरल्या कशा असा सवाल पोलिसांनी उपस्थित केला असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होतात का? त्याची चौकशी सध्या सुरु करण्यात आली आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया,पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्न गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम,उपनिरीक्षक गणेश माने, गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अंमलदार केराप्पा माने, शिवानंद स्वामी,दीपक खरात, दिलीप चौधरी, संतोष इंगळे, प्रमोद वेताळ, उषा दळे, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, विपुल जाधव, देवा राऊत, अतिश कुडके, सागर अवसरे, नामदेव कापसे, शिवाजी मुंढे, अजित सानप, संदेश देशमुख, उद्धव खेडेकर यांनी ही कामगिरी केली आहे.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.