Skip to main content

जुन्या भांडणाच्या रागातून महिलेचा निर्दयीपणे खून.

पुणे प्रतिनिधी:

जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेला डोक्यात हत्याराचे वार करून खून केल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मौजे जांब येथे हा प्रकार घडला. मृत महिलेचा मृतदेह ऊस आणि बाजरी असणाऱ्या शेताच्या बांधावर आढळून आला. याप्रकरणी एका व्यक्तीवर वालचंद नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता पांडुरंग वाघमारे (वय.४५ वर्ष) रा. वडजल, ता. माण, जि. सातारा असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय बाळू साठे रा. जांब, ता. इंदापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी मिलींद रमेश मिठ्ठापल्ली यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्टच्या रात्री दहाच्या दरम्यान संगीता वाघमारे तसेच महेंद्र मच्छिंद्र गायकवाड यांच्यात वाद झाला होता. यावेळी संगीता यांनी गायकवाड यांना शिवीगाळ केली होती. या भांडणाच्या कारणावरून गायकवाड याचा नातेवाईक अक्षय साठे याने संगीता यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात हत्याराने वार केले. या हल्ल्यामध्ये संगीता गंभीर जखमी झाल्या. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने अखेर संगीता यांचा मृत्यू झाला. आरोपींनी अत्यंत निर्दयी पद्धतीने संगीता यांचा खून करून त्यांचा मृतदेह तेथील शेताच्या बांधावर टाकून दिला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी या प्रकरणाचा अधिक तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान क्षुल्लक कारणावरून टोकाचे वाद आणि त्यानंतर खून करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.