Skip to main content

अहमदाबादचा पोलीस आयुक्त बोलतोय म्हणत घातला पोलिसांनाच गंडा

 पिंपरी प्रतिनिधी:

मी अहमदाबाद पोलीस आयुक्त विजयिसंग साहेब बोलतोय, असे सांगून पैसे उकळणाऱ्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खबऱ्या असल्याची बतावणी करून त्याने वारंवार पोलिसांकडून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कामगिरी केली. खलीउल्लाहा अयानुल्लाह खान (वय ४२, रा. जोगेश्वरी, मुंबई), असे अटक केलेल्या तोतयाचे नाव आहे. त्याला शुक्रवारपर्यंत (दि. ३१) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ८ ते २८ डिसेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पोलीस नियंत्रण कक्षात पोलिसांना वारंवार फोन केला. मी अहमदाबाद पोलीस आयुक्‍त विजयसिंग साहेब बोलतोय,  आपल्या पोलीस आयुक्‍तांचा फोन नंबर द्या, असा कॉल आरोपीने केला. त्यानुसार पोलीस आयुक्‍तांचा फोन नंबर देण्यात आला. त्यानंतर आरोपीने पुन्हा कॉल केला. तुमचे पोलीस आयुक्त यांना मी वारंवार फोन करतो, परंतू ते माझा फोन उचलत नाहीत. पिपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैधपणे मोठ्या प्रमाणात पिस्तूलची डिल करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी माहिती द्यायची आहे. तुमच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे फोन नंबर मला द्या, असे आरोपीने सांगितले.

त्यानुसार त्याला अधिकाऱ्यांचे नंबर देण्यात आले. त्यानंतर पुन्हा आरोपीने फोन केला. मी पोलीस आयुक्‍तांना २५ वेळा फोन केला. परंतू ते फोन उचलत नाहीत, असे आरोपी म्हणाला. मी गुप्त खबऱ्या बोलतोय, तुमच्या हद्दीमध्ये पिस्तूलची अवैध विक्री होणार आहे, असे सांगून त्याने पोलीस उपनिरीक्षकाच्या व्हॉट्सअपवर पिस्तूल विक्री करणाऱ्या इसमांचे फोटो, गाडीचा फोटो व पिस्तूलचे खोटे फोटो पाठविले. तसेच पैशांची मागणी केली.

आरोपीबाबत संशय आल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. आरोपी हा गोरेगांव, मुंबई येथे असल्याचे समोर आल्याने पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले. त्यानंतर आरोपीचा विश्वास संपादन करण्यासाठी २४ हजार रुपये त्याच्या पेटीएम व गुगलपेवर पाठविले. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याने यापूर्वी बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून अशाच प्रकारे आर्थिक फसवणूक केली असल्याचे चौकशीत समोर आले. त्याच्या विरुद्ध मुंबई येथील मालाड, गोरेगाव, ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत.

आरोपी हा ऑनलाईन पध्दतीने पोलीस नियंत्रण कक्षाचे फोन नंबर प्राप्त करायचा आणि पोलीस नियंत्रण कक्षाकडून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर प्राप्त करून त्यांच्याशी संपर्क साधायचा. माझ्याकडे पिस्तूलचे काम आहे, अशी बतावणी करायचा. त्यानंतर पैशांची मागणी करून पोलिसांची ऑनलाईन पध्दतीने फसवणूक करायचा. पोलिसांचा गुप्त खबऱ्या असल्याची बतावणी करून सन २०१५ पासून आर्थिक फसवणूक करीत असल्याचे आरोपीने कबुल केले आहे.

पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सागर पानमंद, प्रदिपसिंग सिसोदे, उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र घनवट, विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, अतुल लोखंडे, योगेश तिडके, नितेश बिच्चेवार, नागेश माळी, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, राजेश कोकाटे, सोनाली माने, अमोल साडेकर, सुमित डमाळ, अमोल शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.