Skip to main content

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा काम बंद आंदोलन

मुंबई प्रतिनिधी:



राज्यातील एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याच्या आणि आर्थिक समस्येमुळे होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या मागणीसाठी राज्यातील काही एसटी आगारांत कामगारांनी शुक्रवारीही काम बंद आंदोलन सुरु ठेवले. त्यामुळे ३४ आगारांतील बस सेवा ठप्प झाली. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांना खासगी वाहतुकीने प्रवास करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे भत्ते वाढवल्याने कामगार संयुक्त कृती समितीने उपोषण मागे घेतल्याचे गुरुवारी रात्री जाहीर केल्यानंतरही शेवगाव (जि. नगर) आगारामध्ये एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच कर्मचारी अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी काही आगारातील काम बंद केले. त्यामुळे आगारे बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत.



कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्त्यात वाढ यांसह काही मागण्यांसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह एसटीतील बहुतांश संघटनांनी कृती समिती स्थापन करून बेमुदत उपोषण केले. त्यामुळे एसटीच्या २५० पैकी १९० आगारांतील काम बंद पडले होते. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कृती समितीशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता आणि घरभत्ता देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एसटी कामगार कृती समितीने आंदोलन मागे घेतले होते.



कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचे आदेश

कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने एसटी महामंडळाने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन त्वरित मागे न घेतल्यास, त्यांच्यावर बडतर्फीपर्यंतची कारवाई करण्याचे आदेश देणारे परिपत्रक महामंडळाने काढले आहे. कारवाईच्या इशाऱ्यानंतर बंद असलेल्या ३४ पैकी ४ आगारांतील वाहतूक पुन्हा सुरू झाली.

कर्मचाऱ्यांचे आंदोलन बेकायदा

शुक्रवारी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत एसटी महामंडळाने औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान या याचिकेवर अंतरिम आदेश देत औद्योगिक न्यायालयाने संबंधित आंदोलने, संप, निदर्शने बेकायदा ठरवली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे न घेतल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश देणारे परिपत्रक एसटी महामंडळाने काढले आहे.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.