Skip to main content

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा काम बंद आंदोलन

मुंबई प्रतिनिधी:



राज्यातील एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याच्या आणि आर्थिक समस्येमुळे होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या मागणीसाठी राज्यातील काही एसटी आगारांत कामगारांनी शुक्रवारीही काम बंद आंदोलन सुरु ठेवले. त्यामुळे ३४ आगारांतील बस सेवा ठप्प झाली. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांना खासगी वाहतुकीने प्रवास करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे भत्ते वाढवल्याने कामगार संयुक्त कृती समितीने उपोषण मागे घेतल्याचे गुरुवारी रात्री जाहीर केल्यानंतरही शेवगाव (जि. नगर) आगारामध्ये एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच कर्मचारी अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी काही आगारातील काम बंद केले. त्यामुळे आगारे बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत.



कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्त्यात वाढ यांसह काही मागण्यांसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह एसटीतील बहुतांश संघटनांनी कृती समिती स्थापन करून बेमुदत उपोषण केले. त्यामुळे एसटीच्या २५० पैकी १९० आगारांतील काम बंद पडले होते. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कृती समितीशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता आणि घरभत्ता देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एसटी कामगार कृती समितीने आंदोलन मागे घेतले होते.



कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचे आदेश

कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने एसटी महामंडळाने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन त्वरित मागे न घेतल्यास, त्यांच्यावर बडतर्फीपर्यंतची कारवाई करण्याचे आदेश देणारे परिपत्रक महामंडळाने काढले आहे. कारवाईच्या इशाऱ्यानंतर बंद असलेल्या ३४ पैकी ४ आगारांतील वाहतूक पुन्हा सुरू झाली.

कर्मचाऱ्यांचे आंदोलन बेकायदा

शुक्रवारी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत एसटी महामंडळाने औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान या याचिकेवर अंतरिम आदेश देत औद्योगिक न्यायालयाने संबंधित आंदोलने, संप, निदर्शने बेकायदा ठरवली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे न घेतल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश देणारे परिपत्रक एसटी महामंडळाने काढले आहे.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.