Skip to main content

तरुण बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने उडाली खळबळ

शिरूर  प्रतिनिधी:



गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या येथील तरूण बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह आज (ता. २९) सकाळी, पुणे - नगर रस्त्यावरील नारायणगव्हाण (ता. पारनेर) शिवारातील विहिरीत आढळून आल्याने व त्याच्या चेह-यावर आणि शरीरावर मारहाणीच्या खूणा आढळून आल्याने खळबळ उडाली. 'आमच्या मुलाचा खून करून त्याला विहीरीत फेकून दिले असून, आरोपींना तात्काळ अटक करावी', या मागणीसाठी शिरूरमधील तरूणांनी व मृत बांधकाम व्यावसायिकाच्या नातेवाईकांनी सुमारे दोन तास पुणे - नगर रस्ता रोखून धरल्याने नारायणगव्हाण परिसरात मोठा गोंधळ झाला.


आदित्य संदीप चोपडा (वय २४, रा. हुडको वसाहत, शिरूर) असे मृत बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्याच्या कुटूंबियांनी दिलेल्या माहितीनूसार, आदित्य सोमवारी (ता. २७) कडूस या मूळगावी गेला होता. तेथून परतताना रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्याने कुटूंबियांशी संपर्क साधून बेलवंडी फाटा येथे असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही. रात्री आठ नंतर त्याचा मोबाईलही बंद लागल्याने त्याच्या कुटूंबियांनी व हुडको परिसरातील तरूणांनी बेलवंडी फाटा, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण परिसरात त्याचा शोध घेतला असता नारायणगव्हाण जवळील नवले मळ्यानजीक रस्त्याकडेला त्याची दूचाकी मिळून आली. परिसरात चौकशी केली असता, तीन तरूणांशी त्याची किरकोळ हुज्जत झाली व त्यांनी त्याला त्यांच्या दूचाकीवर बसवून नेल्याची माहिती मिळाल्याने आदित्यच्या कुटूंबियांनी सुपे पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्याचे अपहरण झाल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी तत्काळ दखल घेण्याऐवजी दुस-या दिवशी येण्यास सांगितले. काल (ता. २८) दिवसभर थांबूनही संध्याकाळी आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली.
दरम्यान, आज सकाळी ११ च्या सुमारास नारायणगव्हाण जवळील नवले मळ्यातील विहिरीत आदित्यचा मृतदेह आढळला. सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी पोलिस दलासह घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक ग्रामस्थ व तरूणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी आदित्यच्या चेह-यावर व शरीरावर मारहाणीच्या खूणा आढळून आल्या. या घटनेची माहिती मिळताच, शिरूरमधील आदित्यच्या मित्रांनी, नातेवाईकांनी, हुडको व परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त नातेवाईकांनी आरोपींचा शोध घेतल्याशिवाय मृतदेह हलवू न देण्याचा पवित्रा घेतला. 

काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितल्यावर त्यांची नावे जाहीर करा व खूनाचा गुन्हा दाखल करा, अशी आग्रही मागणी नातेवाईकांनी केल्याने गोंधळ वाढत गेला. त्यातच माजी केंद्रीय मंत्री दिलिप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी घटनास्थळी येऊन हा खूनाचा प्रकार आहे व या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. त्यावेळी संतप्त जमावाने पुणे - नगर महामार्ग रोखून धरला.
दरम्यान, डीवायएसपी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, गोकावे यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर पकडल्याशिवाय मृतदेह पोस्टमार्टेमसाठी हलवू देणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने मोठा गोंधळ झाला. या गोंधळातच सुमारे दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गु्न्हे अन्वेशनच्या पथकामार्फत केला जाईल व दोषींची गय केली जाणार नाही, असे आश्वासन पाटील यांनी दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

आदित्य चोपडा याच्या मृत्युबाबत नेमकी माहिती समोर आली नसल्याने मृत्युच्या कारणावरून शहर व परिसरात उलट - सुलट चर्चा चालू आहे. बांधकाम व्यवसायातील स्पर्धेतूनच ही घटना घडल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. पारनेर तालुक्यातील रस्त्यांची व इतर छोटी - मोठी कामे आदित्य घेत होता. ज्या नवले मळ्यातील विहिरीत त्याचा मृतदेह आज आढळून आला त्याच नवले मळ्याकडे जाणा-या रस्त्याच्या काॅक्रीटीकरणाचे काम त्याने घेतले होते. त्यातून वितुष्ट आलेल्या प्रतिस्पर्ध्यांनी त्याचा घात केला असल्याचा आरोप स्थानिक तरूणांनी केला. या प्रकरणी सुपे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे पोलिस निरीक्षक गोकावे यांनी सांगितले.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.